शिर्डी (प्रतिनिधी):गणेश कुंभकर्ण अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत संपूर्ण घडामोडींवर भाष्य केले. सध्या समोर येणाऱ्या माहितीमुळे प्रकरणाची गंभीरता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आणि सत्य बाहेर येणे अत्यावश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. समाजातील सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला मुळीच सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः महिलांवर अन्याय झाला असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सकडे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पोलीस तपास सध्या सुरू असून, येत्या काळात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. काही व्हिडिओंमधून नगर जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या सहभागाचे संकेत मिळत असल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. तपास यंत्रणा आपले काम करत असून, कोणताही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रत्येक वादात ‘तो’च लोकप्रतिनिधी का दिसतो, असा थेट सवाल उपस्थित करत डॉ. सुजय विखे पाटील यांनी वारंवार वादग्रस्त घटनांमध्ये एका लोकप्रतिनिधीचा चेहरा समोर येत असल्याकडे लक्ष वेधले. ही केवळ योगायोगाची बाब आहे का, की त्यामागे काही वेगळे वास्तव दडले आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता जनतेवर आली आहे, असे ते स्पष्टपणे म्हणाले. आपण निवडून देत असलेले लोकप्रतिनिधी खरोखरच समाजाच्या हितासाठी काम करतात का, की ते फक्त वादांमध्येच दिसून येतात, हा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठाम शब्दांत सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post