विधानसभा निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नीटपणे समजावून घेणे गरजेचे असून निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, ईव्हीएम समन्वयक शारदा जाधव आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, रविवारपासून मतदान यंत्रावर उमेदवारांचे चिन्ह टाकण्यास सुरूवात होईल. त्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करून स्टाँगरूममध्ये ठेवण्यात येतील. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँगरूम १९ नोव्हेंबर रोजी उघडून मतदान यंत्र मतदान केंद्र पथकांना देण्यात येतील. मतदानाच्यादिवशी अभिरूप मतदान झाल्यावर प्रत्यक्ष मतदानास सुरूवात होईल. ही संपूर्ण सर्वसमावेशक आणि पारदर्शक असावी यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकवेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि काही शंका असल्यास वेळीच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मुक्तपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती जाधव यांनी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
Post a Comment